Publish Date: Thu, 12 Mar 2020 (16:58 IST)
Updated Date: Thu, 12 Mar 2020 (17:13 IST)
तीन चाकांचे सरकार अशी टीका ठाकरे सरकारवर विरोधक कायमच करत आले आहेत. हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, असा दावाही विरोधक सातत्याने करत आले आहेत. याच मुद्दयावर आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे.
सरकारबद्दल कुणाला काही म्हणायचे आहे ते म्हणू दे, मला महाराष्ट्राची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ वार्ताहर संघात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगले आणि सर्वांना घेऊन काम करत आहेत, अशी स्तुतीही पवार यांनी केली. सरकार पाडण्याबाबत उलटसुलट चर्चा व प्रयत्न होतो आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर पवार म्हणाले की, शिमगा नुकताच संपला आहे. त्यामुळे अजून कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नाही, असे मला वाटते, असा टोलाही पवार यांनी लगावला.