Publish Date: Mon, 21 Sep 2020 (08:29 IST)
Updated Date: Mon, 21 Sep 2020 (08:32 IST)
ठाण्यातील भिंवडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली आहे.
भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य हाती घेतल्यानंतर २० नागरिकांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. सकाळी साडेसातपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
कोसळलेल्या जिलानी इमारतीच्या चारही बाजूंनी इतर इमारती असल्यामुळं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवळपास ३५-४० जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या भागात असल्यामुळं घटनास्थळी जेसीबी, डंपर थेट घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळं बचावकार्यात अडथळा येत आहे.