Publish Date: Tue, 12 Mar 2019 (08:55 IST)
Updated Date: Tue, 12 Mar 2019 (08:59 IST)
मुंबई येथील आयआयटी हॉस्टेलमधील २५ विद्यार्थींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व मुलींना गोड पदार्थांतून विषबाधा झाली आहे. अन्न विषबाधेने १० नंबर हॉस्टेलमधील २५ मुलींना आयआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार करुन प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना पुन्हा हॉस्टेलमध्ये सोडण्यात आले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई आयआयटी प्रसिद्ध संस्था आहे. आयआयटी मुंबईमध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेतात. पंचवीस विद्यार्थींनींना हॉस्टेलमधील अन्नातून विषबाधा झाली आहे. आयआयटी हॉस्पिटलकडून हा दावा खोडून काढण्यात आला होता. पण, आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आयआयटी मुंबईकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एच १० या मुलींच्या हॉस्टेलमधील २५ मुलींना विषबाधा झाली होती. मुलीसाठी बनवलेल्या जेवणात गोड पदार्थ सेवन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते, इथली मेस स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आली असून पालिकेकडून या मेसची तपासणी केली गेली आहे. सोबतच अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विषबाधेचे कारण अहवालानंतर उलगडणार आहे असे आयआयटी प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले आहे.