Publish Date: Fri, 01 Mar 2019 (16:40 IST)
Updated Date: Fri, 01 Mar 2019 (16:53 IST)
जम्मूच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे 'एमआय-17 व्ही 5' बनावटीचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलटसह सहा जण शहीद झाले. त्यात मूळचे नाशिकचे असलेले पायलट निनाद मांडवगणे यांचाही समावेश होता.
निनाद हे नाशिकच्या डीजीपीनगर येथे राहत होते. ते अत्यंत हुशार, मनमिळाऊ, नम्र, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. त्यांना लहानपणापासूनच सैन्याचे आकर्षण होते आणि. लष्करी विमान, हेलिकॉप्टर या सर्वांच्या आकर्षणापोटी ते सैन्यात भरती झाले. आधी भोसला मिलिटरी स्कूल आणि नंतर औरंगाबाद येथे शिक्षण घेतल्यानंतर 2009 साली त्यांची सैन्यात भरती झाली. नाशिकचे निनाद हे औरंगबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून रुजू झाले.
सैन्य दलाची पार्श्वभूमी नसताना देखील देश सेवेची भावना असल्यामुळे त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. एनडीएतर जागा मिळाल्यावर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पायलट बनण्याचे प्रशिक्षण घेतले. बीई मेकॅनिकल इंजिनियर निनाद यांनी हैदराबाद येथे ट्रेनिंग पूर्ण केली नंतर देश सेवेसाठी आपली सेवा दिली.
त्यांना व्यावसायिक फ्लाईट्ससाठी ऑफर असताना देखील त्यांनी पैशांसाठी उड्डाण करणार नाही असे ठाम आपल्या मत आपल्या वडिलांसमोर मांडले होते. त्यांचे वडील बँकेत कार्यरत होते. त्याचा भाऊ जर्मनीत सीएचा अभ्यास करत असून त्याच्या घरात आई-वडील, बायको आणि दोन वर्षांची मुलगी आहे.
या परिस्थितीत देखील निनादची पत्नी धीर दाखवत आहे आणि त्यांनी हे देखील म्हटले की संधी मिळाली तर सैन्यात भरती होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करेन. नाशिकरांना, त्यांच्या नातेवाइकांना तसेच मित्रांना त्यांच्यावर अभिमान आहे.