Publish Date: Thu, 07 Sep 2017 (11:14 IST)
Updated Date: Thu, 07 Sep 2017 (11:19 IST)
1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मास्टरमाइन्ड कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह सहा आरोपींना गुरुवारी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. अबू सालेमला दिल्या जाणार्या सदरच्या शिक्षेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश सानप यांनी मुस्तफा डोसा, कुख्यात गँगस्टर अबू सालेम, करिमुल्लाह खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट या सहा आरोपींना 16 जूनला दोषी ठरवले. तर सातवा आरोपी अब्दुल कय्युमला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.तर मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आता उर्वरित पाच दोषींना न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. त्यांच्या शिक्षेसंदर्भात उभय पक्षांचे युक्तीवाद ऐकून शिक्षा ठोठावण्यासाठी टाडा विशेष न्यायालयाने 7 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.
सरकारी पक्षाने दोषी ठरवण्यात आलेल्या ताहिर मर्चंट, फिरोज खान, करिमुल्लाह खान यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा तर भारताने
पोर्तुगालशी केलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यामुळे अबू सालेमला आणि रियझ सिद्दीकीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली आहे.