Publish Date: Fri, 11 May 2018 (11:26 IST)
Updated Date: Fri, 11 May 2018 (11:31 IST)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 130 पेक्षाही जास्त जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल, त्यामुळे इतर कोणत्या पक्षाकडून पाठिंबा घेण्याचा प्रश्र्नच निर्माण होत नाही, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरुत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसच्या काळात कायद्याते तीनतेरा वाजले असल्याचे म्हटले.
काँग्रेस लोकशाहीच्या विरोधात जात ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. राजराजेश्वरी नगर येथे सापडलेल्या बनावट मतदार ओळखपत्रांवरुन काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकते हे आपण पाहिले आहे. ज्यांच्या नावे बनावट ओळखपत्रे बनवण्यात आली आहेत त्यांना मला अलर्ट करायचे आहे की, काँग्रेसच्या जाळ्यात अडकून निवडणुकीवर परिणाम होऊ देऊ नका असे आवाहन शहा यांनी केले आहे. शहा यांनी यावेळी सिध्दरामय्या यांच्यावर टीका करताना पराभवाच्या भीतीने ते दोन जागी उभे आहेत असा टोला मारला आहे, सोबतच जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले की, एकवेळ आम्ही पराभव स्वीकारु मात्र सोशल डोमेक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंय ऑफ इंडियाची मदत घेणार नाही. काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचा पाठिंबा घेऊ शकते आणि हाच त्यांच्यातील आणि आमच्यातील फरक आहे. काँग्रेस देशद्रोहींचा पाठिंबा घेताना मागेपुढे पाहात नाही.