Publish Date: Fri, 22 May 2020 (14:47 IST)
Updated Date: Fri, 22 May 2020 (14:54 IST)
1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, आता मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान महाचक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे भारतात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहापात्रा यांनी मान्सूनच्या आगमनाविषयीची माहिती दिली. मान्सून केरळच्या किनारपट्टीवर 1 जून रोजी दाखल होणार होता. मात्र, अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे 1 जूनऐवजी 5 जून रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असे मोहापात्रा म्हणाले.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळामुळे मान्सूनसाठी लागणार्या अनुकूल परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मान्सूनवर याचा परिणाम झाला आहे. 5 जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्याचबरोबर अम्फानमुळे देशातील वातावरणावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.