Publish Date: Sat, 15 Sep 2018 (09:50 IST)
Updated Date: Sat, 15 Sep 2018 (09:53 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र, अण्णा हजारे २ ऑक्टोबरपासून उपोषणावर ठाम आहेत. महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांशी चर्चा केली. राज्य आणि केंद्र सरकारने अण्णांनी नमूद केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांना सांगितले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून येत्या हंगामापासून तसा दर शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, असे महाजन यांनी सांगितले.
अण्णांनी नमूद केलेले काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारित असून केंद्र शासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. केंद्रात लोकपाल आणि राज्यस्तरावर लोकायुक्त यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचेही जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.