Publish Date: Tue, 01 Mar 2022 (12:24 IST)
Updated Date: Thu, 29 Sep 2022 (17:14 IST)
महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त झारखंड (Jharkhand) मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंड मधील बाबाधाम मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाली आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
भाविकांनी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि यामुळे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था काही क्षणासाठी कोलमडून गेली होती. एका वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त समोर आणून म्हटले आहे की प्रशासनाच्या दर्शनम काऊंटरजवळ मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक पुरुष आणि महिला जखमी झाले असल्याचे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने भाविकांवर लाठीमार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा गोंधळ खूप वेळ सुरू होता. यावेळी पूजा आणि दर्शनाकरिता आलेले बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांना देखील जिल्हा प्रशासनाने सहकार्य केले नाही. या दरम्यान मंदिराच्या व्यवस्थापकाने आमदार (MLA)अंबा प्रसाद यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली होती. याचवेळी आमदार अंबा प्रसाद जखमींना भेटण्यासाठी पोहोचल्या आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी एसडीओंकडे पोहचल्या तेव्हा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.