Publish Date: Tue, 03 Apr 2018 (10:41 IST)
Updated Date: Tue, 03 Apr 2018 (10:53 IST)
मध्यप्रदेशात दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार निवारण अधिनियम (अॅट्रॉसिटी) कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी देशभरात सोमवारी भारत बंद आंदोलन पुकारला. मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांसह इतर राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मुजफ्फरनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. तर दिल्ली-डेहराडून महामार्गावर चक्का जाम करण्यात आले आहे. रेल्वेसेवा आणि बाजारपेठांवर या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. पंजाबमध्ये सायंकाळी ५ वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र शाळाही बंद करण्यात आल्या असून दहावी-बारावीचे पेपर रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका सरकारकडून दाखल करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी हिंसाचार भडकणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
भारत बंद आंदोलनात अनेक राज्यांत रास्तारोको करण्यात आला आहे. बसेस, पोलिस ठाण्यांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. राजस्थानातील बाडमेर येथे आंदोलकांनी गाड्या पेटवून दिल्या. तसेच पंजाब, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही आंदोलकांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली आहे.