Publish Date: Sun, 02 May 2021 (17:50 IST)
Updated Date: Sun, 02 May 2021 (17:51 IST)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहे. याचं श्रेय पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं असल्याचं सांगत भाजप या निवडणूक निकालांचं आत्मपरिक्षण करेल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. सुरुवातीचे कल हाती येत असताना विजयवर्गीय यांनी सकाळीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. अंतिम निकाल येईपर्यंत नेमकी परिस्थिती कळू शकणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला होता.
बंगाल निवडणूक निकालाबाबत केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी पक्षाच्या वाईट कामगिरीबाबत आपली फोनवर चर्चा झाल्याचं विजयवर्गीय यांनी सांगितलं. तसंच भाजप खासदार बाबुल सुप्रियो आणि लॉकेट चॅटर्जी पिछाडीवर असल्याचं आश्चर्य वाटत असल्याचं ते म्हणाले. तृणमूल काँग्रेस पक्ष फक्त ममता बॅनर्जी यांच्यामुळे विजयी झाला आहे. लोकांनी दीदींना निवडलं. आमच्याकडून कोणत्या चुका झाल्या, त्याबाबत आम्ही आत्मपरिक्षण करू, असं विजयवर्गीय म्हणाले.