Publish Date: Wed, 13 Nov 2019 (15:51 IST)
Updated Date: Wed, 13 Nov 2019 (15:56 IST)
‘हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे’ या म्हणीचा प्रत्यय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येत असेल, असा टोला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी लगावला आहे. सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेवर चौहान यांनी ट्विटरवरुन टीका केली.
‘आधी छोड़ पूरी को धावे आधी मिले न पूरी पावे’ अशी हिंदीतील म्हण चौहानांनी ट्विटरवर शेअर केली आहे. याचा अर्थ, अर्ध सोडून अख्ख्याच्या मागे धावलात, ना अर्ध मिळालं, ना अख्खं. यामध्ये उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा थेट उल्लेख नसला, तरी साहजिकच उद्धव ठाकरे यांना सत्तासमीकरणं जुळवताना येत असलेल्या अडचणींवर हे भाष्य आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या ट्वीटवर अनेकांनी रिप्लाय करताना शिवसेनेशी संबंध जोडला आहे.