Publish Date: Wed, 26 Feb 2020 (10:11 IST)
Updated Date: Wed, 26 Feb 2020 (10:14 IST)
दिल्लीतील परिस्थिती सध्या अधिकच बिकट बनली आहे. ठिकठिकाणी हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना जाळपोळ करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या भागातील चांद बाग आणि भजनपुरा या भागात दंगलखोरांनी दगडफेक करीत जाळपोळी केल्या आहेत. एका ताज्या घटनेत काही दुकानेही पेटवून देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. येथील चार भागांमध्ये कर्फ्यु देखील जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीत रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १८० जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या घटना आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेत ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, चांद बाग आणि करवाल नगर या चार भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
इथली परिस्थिती गंभीर बनल्याने खबरदारी म्हणून आज अर्थात बुधवारी दिल्लीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली.