Publish Date: Tue, 23 Apr 2019 (09:50 IST)
Updated Date: Tue, 23 Apr 2019 (09:55 IST)
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून मुंबईकडे जाणाऱ्या कामयानी एक्स्प्रेसमधून सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. धुराचे लोट मोठे असल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मनमान स्टेशनवर तांत्रिक तपासणीनंतर रात्री ११ वाजेला ही रेल्वे मुंबईकडे रवाना झाली.
कामयानी एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना मनमाड स्टेशनवर रेल्वे थांबवायची असल्याने वेग कमी करण्यासाठी चालकाना ब्रेक दाबले. या वेळी इंजिनपासून चार नंबरच्या डब्याचे ब्रेक गरम होऊन, त्यातून धूर व जाळ निर्माण झाला. त्यामुळे संपूर्ण गाडीलाच आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेच्या काही मिनिटांत गाडी कमी वेगात मनमाड रेल्वे स्टेशनवर पोहोचली. रेल्वे सुरक्षा बल सीएन्ड वॅगन स्टाफने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या ठिकाणी गाडीची तांत्रिक तपासणी करण्यात आली. प्रवाशांनाही ही बाब समजल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.