Publish Date: Fri, 11 Aug 2017 (11:20 IST)
Updated Date: Fri, 11 Aug 2017 (11:21 IST)
देशातील मुस्लिम समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे, असे परखड विधान मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवरच लोकशाहीचे मूल्यमापन होत असते, असे उद्गारही त्यांनी काढले.
सलग दुसर्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवणार्या हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ गुरुवारी संपला. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीला त्यांनी मनमोकळी मुलाखत दिली. त्याबरोबरच राज्यसभेत सत्काराला उत्तर देताना त्यांनी भाषणही केले. त्यांनी देशातील चालू घडामोडींवर भाष्य केले. निष्पाप नागरिकांना जमावाने ठेचून मारणे, घरवापसी, विचारवंतांच्या हत्या यांसारख्या घटनांवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
भारतीय मूल्यव्यवस्था कमकुवत होत असल्याचे हे लक्षण आहे. काही लोकांच्या भारतीयतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, यासारखी वेदनादायक गोष्ट दुसरी नाही. मुस्लिम समाजाकडं संशयानं पाहिलं जात असल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या वेगवेगळ्या भागांत फिरताना मला हे ऐकायला मिळालं, असे ते म्हणाले.