Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताने चुकून पाकिस्तानवर मिसाईल डागलं

भारताने चुकून पाकिस्तानवर मिसाईल डागलं
, शुक्रवार, 11 मार्च 2022 (22:43 IST)
भारताकडून पाकिस्तानवर चुकून एक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं आज भारत सरकारच्या वतीने सांगण्यात आलं.
नेहमीच्या देखभालीदरम्यान एका "तांत्रिक गडबडीमुळे" हे घडल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. यासाठी "दिलगिरी"सुद्धा व्यक्त करत असताना, सुदैवाने कुणाचा मृत्यू झाला नाही, याचं समाधान भारतानं व्यक्त केलं आहे.
 
एक "वेगवान उडती वस्तू" मिया चान्नू शहराच्या जवळ कोसळल्याचं पाकिस्तानच्या वतीने सांगण्यात आलं. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने हा संभाव्य धोका मोठा असू शकला असता.
 
भारताने शुक्रवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलं, की "9 मार्च 2022 रोजी नेहमीच्या देखभालीदरम्यान एक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे चुकून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. भारत सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे."
 
हरियाणामधल्या सिरसामधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं.
 
तर पाकिस्तानच्या वतीने यावर प्रतिक्रिया देताना भारताला इशारा देण्यात आला आहे. "अशा हलगर्जीपणासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते," असं सांगताना इस्लामाबादने भारताला तंबीसुद्धा दिली आहे की अशी चूक पुन्हा होऊ नये.
 
पाकिस्तानच्या वायुदलाने दिलेल्या माहितीनुसार हे मिसाईल माक- 3 म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट वेगाने, 12 हजार मीटर उंचीवर उडालं होतं. पाकिस्तानच्या हवाईहद्दीत तब्बल 124 किलोमीटर प्रवास करून ते कोसळलं, असं सांगण्यात आलं.
 
"या मिसाईलच्या मार्गात भारत आणि पाकिस्तान दोन्हीच्या हवाई हद्दीतल्या अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स होत्या. त्यामुळे अनेक जिवांना तसंच साधनसंपत्तीला धोका निर्माण झाला होता," असंही पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते मेजर-जनरल बाबर इफ्तिखारो यांनी गुरुवारी सांगितलं. त्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या पाकिस्तानमधल्या उच्चायुक्तांना बोलावून घटनेची तक्रार केली. या घटनेच्या चौकशीतून काय समोर येईल, ते आम्हालाही सांगावं, अशी विनंती पाकिस्तानने भारताकडे केली आहे.
 
युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आजूबाजूच्या भागांवर रशियन सैन्याचे हल्ले सुरूच आहेत. अनेक नागरिकांनी पश्चिमेतल्या शहरांमध्ये पळ काढला आहे तर अनेक जणांनी हवाई हल्ल्यापासून बचावासाठी भूमिगत मेट्रो स्ट्रेशन्समध्ये आसार घेतलाय.
युक्रेनमधल्या मारिओपोल शहराला रशियन सैन्याने चहुबाजूंनी वेढलंय. रशियन सैन्य सतत बॉम्बहल्ले करत असल्याने मारिओपोल शहराचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलाय.
अनेकांनी यापूर्वीच शहरातून पळ काढला असला तरी अजूनही अनेकजण शहरात अडकले असून त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
युक्रेनमधले एक खासदार दिमित्रो गुरिन हे मारिओपोलमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे आईवडील या शहरात अडलेले आहेत आणि चार दिवसांपूर्वी गुरिन यांचं त्यांच्या शेजाऱ्यांशी शेवटचं बोलणं झालं होतं.
 
गुरिन सांगतात, "आ्ही तीस सेकंदं बोललो. ते नंतर अशा ठिकाणी गेले जिथे फोनला सिग्नल मिळत होता. शहरातल्या काही ठिकाणीच फोनला सिग्नल मिळतोय हे लोकांना माहिती आहे. माझे आई-वडील जिवंत आहेत आणि त्यांच्या निवासी इमारतीच्या तळघरात राहतायत. पण इथे वीज - पाणी - टॉयलेट नाही. ते काही शेल्टर नाही. फक्त एक तळघर आहे."
 
चार लाख लोकवस्तीचं मारिओपोल शहर रशियासाठी महत्त्वाचं आहे. गेल्या 9 दिवसांपासून रशियाने इथे सतत हल्ले केले आहेत. यामुळे अनेक इमारती आणि निवासी संकुलं जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी (9 मार्च) मारिओपोलवर झालेल्या हल्ल्यात दोन वयस्कर व्यक्ती आणि एका मुलीचा मृत्यू झाला होता. तर 17 जण यात जखमी झाले. मारिओपोलमधल्या मॅटर्निटी हॉस्पिटल आणि लहान मुलांच्या वॉर्डवरही रशियाने हल्ला केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रशिया - युक्रेन युद्ध : इव्हानो, फ्रँकिव्हस्क आणि नीप्रोवर हल्ले