Publish Date: Fri, 10 Jul 2020 (14:49 IST)
Updated Date: Fri, 10 Jul 2020 (14:53 IST)
सध्या चीनसोबत वाढलेला तणाव आणि गोपनीय माहितीच्या सुरक्षावरून काही समस्या निर्माण होत असल्याने भारतीय लष्कराने अधिकारी आणि जवानांना मोबाईलमधून सुमारे 89 अॅप्स तत्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. यासाठी 15 जुलै ही मुदत देण्यात आली असून, यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराकडून अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टिकटॉक, पबजी, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिंडरसारखे अॅप काढून टाकण्यास सांगितले आहे. याशिवाय काऊच सर्फिंग आणि बातम्यांसाठी वापरले जाणारे डेलीहंट हे अॅपही डिलीट करण्याची सूचना केली आहे. सुरक्षाच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, 15 जुलैपर्यंत ही प्रक्रिया आटोपवावी. आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.
दरम्यान, व्हॉट्सप, टेलीग्राम, सिग्नल, यूट्यूब, ट्विटर यांचा वापर करण्यासाठी अधिकारी आणि जवानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी आपल्या लष्करामधील सेवेसंबंधी माहिती उघड करू नये अशी अट घातली आहे.