Publish Date: Thu, 28 May 2020 (22:21 IST)
Updated Date: Thu, 28 May 2020 (22:24 IST)
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.
कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्याची तयारी कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारकडून सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
करोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकनं थांबवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.