Publish Date: Tue, 05 Nov 2019 (16:11 IST)
Updated Date: Tue, 05 Nov 2019 (16:13 IST)
सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा मोठा तिढा आहे. बहुमत आणि शिवसेना यांच्या मुले भाजपा सत्ते पासून अजूनतरी दूर आहे. त्यामुळे आता आमदार फुटतील अशी भीती प्रत्येक पक्षाला आहे. त्यात कॉंग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतली असून, आमदारांवर नजरच ठेवली आहे. शिवसेना-भाजपचा सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना, तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आपआपल्या परीने राजकीय हालचाली करत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधींना सांगितल्याची माहिती माध्यमांना दिली असून ते म्हणाले की आम्ही काही रणनीती बनवली आहे, राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधी यांना कळवली आहे. “विधानसभेच्या निवडणुकीत जनमत भाजपच्या विरोधात गेलं असून, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सरकार बनलं पाहिजे, भाजपने ते बनवावं, मात्र सध्या तसं घडताना दिसत नाही. याला कारण भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, याला जबाबदार भाजप आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की राष्ट्रपती राजवटीने कोणी घाबरुन जाणार नाही. आमदार फुटतील अशी आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. कोणी आता या क्षणाला फुटण्याचे धाडस करणार नाही, कोणी फुटलं तर आम्ही सगळे मिळून त्याचा पराभव करु, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिला आहे. अध्यक्ष निवडीची वेळ आली तर आघाडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. जर भाजपने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाला तर सरकारचा पराभव असतो, असं थोरात म्हणाले आहेत.