Publish Date: Thu, 18 Jan 2018 (12:26 IST)
Updated Date: Thu, 18 Jan 2018 (12:31 IST)
दाक्षिणात्य सुपरस्टार 'थलैवा' रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतल्यामुळे तमिळनाडूतील राजकारण ढवळून निघाले असून रजनीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या उत्साहावर विरजण टाकणारी एक बातमी समोर आली आहे. तमिळनाडूत आता लगेच मध्यावधी निवडणुका झाल्यास रजनीकांतच्या पक्षाला 234 जागांपैकी अवघ्या 33 जागा मिळतील, असे एका पाहणीतून पुढे आले आहे.
इंडिया टुडे आणि कार्वी यांनी संयुक्तपणे हा सर्व्हे केला आहे. रजनीकांत यांनी अद्याप पक्षाच्या नावाची घोषणा केलेली नाही. अभिनेता म्हणून त्यांची लोकप्रियता अफाट असली तरी राजकारणाच्या मैदानात त्यांना तितका प्रतिसाद मिळणार नाही. त्यांच्या पक्षाला केवळ 16 टक्के मते मिळतील, असा या सर्व्हेचा अंदाज आहे. त्याचवेळी, करुणानिधी यांच्या द्रमुकला 130 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेला 98 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक नुकसान माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे होण्याची शक्यता आहे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्वहीन झाला असल्याने अण्णा द्रमुकला केवळ 68 जागांवर समाधान मानावे लागणार असे दिसत आहे.