Publish Date: Mon, 04 Jun 2018 (16:07 IST)
Updated Date: Mon, 04 Jun 2018 (16:10 IST)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हणजेच युपीएससी परीक्षेला बसू न दिल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली. ही घटना नवी दिल्लीतल्या राजेंद्र नगरमध्ये घडली. वरूण असे या 28 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. उशिरा पोहोचल्यामुळे त्याला परीक्षेला बसू दिले नाही म्हणून निराश होऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने असे म्हटले आहे की, ‘“नियम असण्यात काही चूक नाही, परंतु सहानुभूतीनं काही विचार तर करायला हवा.” हाच विचार करून त्याने टोकाचा निर्णय घेतला.
युपीएससी स्पर्धा परीक्षांची प्राथमिक फेरी 3 जून रोजी रविवारी पार पडली. रविवारी वरूण परीक्षा देण्यासाठी पहाडगंज इथल्या केंद्रावर गेला. परंतु त्याला जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. निराश झालेल्या या तरूणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. युपीएससीच्या नियमांप्रमाणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटं विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर येणं अपेक्षित आहे. या वेळेत न पोचल्यास प्रवेश दिला जाणार नाही असं हा नियम सांगतो. परंतु वरुणला जाण्यास उशीर झाला. म्हणून त्याला प्रवेश नाकारण्यात आला. वरूण खास युपीएससीच्या अभ्यासासाठी राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता.