Publish Date: Tue, 19 Nov 2019 (15:35 IST)
Updated Date: Tue, 19 Nov 2019 (15:38 IST)
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पूर्ण कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्तास्थापन करता आलेली नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या दोन्ही पक्षांचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत.
भागवत म्हणाले की ”आपसात भांडल्याने दोघांचंही नुकसान होतं, हे माहिती असुनही काहीजण भांडतात” नागपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की
“स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट असून, हे सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडताना दिसून येते. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत,” असं देखील सरसंघचालक म्हणाले आहेत. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.