Publish Date: Mon, 18 Jun 2018 (08:41 IST)
Updated Date: Mon, 18 Jun 2018 (08:46 IST)
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. आता यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निशाण्यावर आले आहेत. केजरीवाल यांनी गेला आठवडाभरराज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरले असून रविवारी संध्याकाळी आम आदमी पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मंडी हाऊस येथून पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडक मारली, तर दुसरीकडे दिल्लीतील या संघर्षावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी नीती आयोगाच्या बैठकीत मोदींना चांगलेच घेरले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीतील साऱ्या घटना, घडामोडींची माहिती देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि चर्चा केली. केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्षाने दिल्लीत राजकीय कोंडी झाली आहे. चार मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पाठीशी आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ‘आप’च्या लढय़ाची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली.