Publish Date: Tue, 02 Jul 2019 (17:48 IST)
Updated Date: Tue, 02 Jul 2019 (17:50 IST)
पावसामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबई येथील मालाडमध्ये भिंत कोसळून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 75 जण जखमी आहेत. आज दिवसभरात अनेक मृत्यू झालेच शिवाय राज्यभरातही पावसामुळे अनेकांचे जीव गेले आहेत . कल्याणमध्ये नॅशनल उर्दू शाळेची सरंक्षण भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. करीमा मोहम्मद चांद, त्यांचा 3 वर्षांचा मुलगा हुसेन चांद आणि शोभा कांबळे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
मालाड सब वेमध्ये पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओमधील दोघांचा दुदैर्वी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे गाडीच्या काचा फोडून तब्बल 6 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिरा रोड:- स्पाईस अॅण्ड राईस हॉटेलमध्ये शॉक लागून दोन कामगारांचा मृत्यू झाला. मिरा रोडच्या प्लेजंट पार्कमधील घटना घडली आहे. वीरेंद्र भुईया आणि राजन दास अशी मृतांची नावं. पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. आंबेगावातील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाशिकमध्येही बिल्डरचा निष्काळजीपणा समोर आला आहे. सातपूर परिसरात सम्राट ग्रुपच्या अपना घर या प्रोजेक्टमध्ये निकृष्ठ बांधकामाने तीन कामगारांचा बळी घेतला आहे. पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.