Publish Date: Tue, 13 Sep 2022 (09:01 IST)
Updated Date: Tue, 13 Sep 2022 (09:05 IST)
राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, रायगड – १, सांगली – १ अशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण ४ पथके तैनात आहेत. तर नांदेड – १, गडचिरोली – १ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केल्या आहेत.
राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्हे व ३८५ गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ३१८ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर ५८०६ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५४० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.