Publish Date: Sat, 17 Aug 2019 (16:31 IST)
Updated Date: Sat, 17 Aug 2019 (16:37 IST)
दरवर्षी नेहमी प्रमाणे या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई असे चित्र आहे. यावेळी मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांपैकी 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा मनपाने केला आहे. 2018-19 या वर्षात 4898 खड्डे भरण्यासाठी पालिकेने 7 कोटी 98 लाख 7 रुपये खर्च केले म्हणजेच प्रति खड्डा भरण्यासाठी पालिकेला 17 हजार 693 रुपये खर्च आल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वे उघडकीस आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पावसाळ्यात म्हणजेच 10 जून ते 1 ऑगस्ट २०१९ या दरम्यान 2 हजार 648 खड्ड्यांपैकी 2 हजार 334 खड्डे मनपाने भरले असून, मुंबईत केवळ 414 खड्डे शिल्लक आहेत. असा अजब दावा केला आहे. आता पालिकेचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झालं आहे.
कारण शेख यांना आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार यंदा 1 एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 पर्यंत खड्ड्यांच्या संदर्भात एकूण 2 हजार 661 तक्रारी ऑनलाईन प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 2 हजार 462 खड्डे भरण्यात आले असून सध्या केवळ 199 खड्डे शिल्लक आहेत. म्हणजेच सर्वच गोलमाल असून पैसे गेले कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.