Publish Date: Sat, 16 Jan 2021 (20:37 IST)
Updated Date: Sat, 16 Jan 2021 (20:46 IST)
औरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
"पुढे पुढे पाहा काय होतंय... महाविकास आघाडीचं एकमत करुनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्या सोबतच या शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही प्राधान्याने सोडवत आहोत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्याला आणखी बळ मिळालं आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबाद मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगर बद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.