Publish Date: Mon, 01 Jul 2019 (16:20 IST)
Updated Date: Mon, 01 Jul 2019 (16:23 IST)
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याचा भुशी धरण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील पर्यटकांना इथे येण्याचे वेध लागतात. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील बरेच असल्याने मुंबईकर आणि पुणेकरांची या ठिकाणी दरवर्षी गर्दी पहायला मिळते.
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. शुक्रवारपासून मुंबई आणि पुणे परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुशी धरण परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. जोरदार पावसाचा फटका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीला बसला असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र त्याचवेळी भुशी धरण भरल्याने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याबरोबर धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणासाठ्यात वाढ झाली. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरुन वाहू लागले आहे.