Publish Date: Thu, 23 Sep 2021 (08:37 IST)
Updated Date: Thu, 23 Sep 2021 (08:39 IST)
एकीकडे भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या दिसत आहेत. तर दुसरीकडे राजभवन आणि ठाकरे सरकार यांच्यातही धुसफूस होताना दिसते. साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला निर्देश देत दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, असं म्हटलं. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलं आहे. यावरुन भाजप आता सरकारवर टिकास्त्र सोडत आहे. त्यातच आता भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्र्यांचं हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, रोजच्या महिला अत्याचाराच्या घटना पाहाता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी राज्यात महिला अत्याचाराची तिसरी लाट येतेय की काय, अशी स्थिती राज्यात येऊ लागतेय. यासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी भाजपाकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.