Publish Date: Sat, 18 Jun 2022 (20:42 IST)
Updated Date: Sat, 18 Jun 2022 (20:44 IST)
बोरीवलीत भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर होते.
मात्र यावेळी भाजपाचे स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी आणि कार्यकर्ते उद्धाटनस्थळी पोहचले. आदित्य यांच्या कार्यक्रमावेळी भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. बोरिवली उड्डाणपूलाचं काम भाजपाच्या काळात झालेले असताना त्याचे श्रेय लाटण्याचं काम शिवसेनेकडून केले जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.
बोरिवली पश्चिमेकडील आर. एम भट्ट मार्ग येथे महापालिकेच्या वतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे बोरिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. याठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत जातो. पावसाळ्यात तर कहर होतो मात्र उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली लागणार आहे. बोरिवली पश्चिममधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे.
हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिमी द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. येथील उड्डाणपुलामुळे श्मामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या वाहतुकीला मदत होणार आहे. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरून हा पूल विस्तारीत झाला असल्याने वाहतुकीचा वेग वाढणारच आहेस सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.