Publish Date: Sat, 19 Jun 2021 (07:59 IST)
Updated Date: Sat, 19 Jun 2021 (08:01 IST)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनाभवनासमोर झालेल्या राड्यावरुन शिवसेनेला इशारा दिलाय. शिवसैनिकांचे राडे असेच सुरू राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम आहेत. शिवसैनिकांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत.
आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत. याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल.