Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी पुन्हा परवानगी, महाविकास आघाडीला धक्का

devendra fadnavis
, शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (12:45 IST)
महाराष्ट्र सरकारने सरकारने CBI ला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची 'जनरल कन्सेंट' पुन्हा बहाल केली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने CBI ला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली होती. त्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय CBI चौकशी करू शकत नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे CBI आता कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतं. आता CBI ला चौकशीसाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. 21 ऑक्टोबर 2020 ला उद्दव ठाकरेंनी CBI ला चौकशीसाठी परवानगी नाकारण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावर सही केली होती. त्यावेळी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. CBI राज्यातील अनेक प्रकरणांची चौकशी करत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीने केंद्रावर तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर केल्याचा सातत्याने आरोप केला होता.
 
याआधी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत. कोणत्या कायद्याने राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकतात? याचा CBI वर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या 9 मुद्यांत.
 
1. CBIची स्थापना 1946ला Delhi Police Establishment Act 1946 या कायद्याने झाली आहे.
 
2. CBIची अखत्यातरीत दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश येतात. या कायद्यातील कलम 6नुसार दुसऱ्या कोणत्याही राज्यात कारवाई करायची असेल तर CBIला त्या राज्याती लेखी परवानगी लागते.
 
3. आंध्रप्रदेशने पूर्वी एका आदेशाने CBIला राज्यात तपासासाठी सर्वसाधारण आदेश दिली होते. पश्चिम बंगालने असे आदेश 1989ला दिले होते.
 
4. ज्येष्ठ वकील गौतम अवस्थी सांगतात कायदा आणि सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. पण CBI तपासाच्या आवश्यकतेनुसार केंद्र सरकारच्या विभागांत संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी हस्तक्षेप करू शकते. 10 कोटींवरील भ्रष्टाचाराची प्रकरणं तपासासाठी CBIकडे जात असतात.
 
5. राज्याने एखाद्या प्रकरणात चौकशीची विनंती केली तर अशा प्रकरणांचा तपास CBI करू शकतं.
 
6. एखाद्या प्रकरणाच्या तपासाचे आदेश जर उच्च न्यायालयाने CBIला दिले असतील तर अशा प्रकरणांचा तपास CBI करू शकतं.
 
गौतम अवस्थी सांगतात राज्यांनी CBIवर जरी निर्बंध लादले तरी CBI तिच्या अखत्यातीमध्ये येत असलेल्या प्रकरणांचा तपास करू शकतं. केंद्र सरकारच्या कार्यालयांत कुठंही आणि कोणत्याही राज्यात गुन्हा झाला असेल तर केंद्र सरकार CBIकडे तक्रार देऊ शकते. तिथं CBIला तपास करावा लागेल, त्यासाठी राज्यांच्या अनुमतीची गरज नाही.
 
7. CBIचे माजी सहसंचालक एन. के. सिंह सांगतात, या निर्णयाचा CBIवर परिणाम होऊ शकतो.
 
"CBI केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकते. पण एखाद्या राज्यात तपास करायचा असेल, छापा टाकायचा असेल तर राज्याची परवानगी घ्यावी लागेल. समजा राज्याने पूर्वी परवानगी दिली असले आणि नंतर ही परवानगी मागे घेतली, तर त्या दिवसापासून CBI त्या दिवसापासून राज्यात काम करू शकणार नाही."
 
8. राज्य घटनेचे अभ्यासक पी. डी. टी. आचार्य सांगतात, केंद्र आणि राज्यातील संबंध फक्त CBIवर अवलंबून नाहीत.
 
"केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकार स्पष्ट आहेत. केंद्र सरकारला आवश्यक वाटले तर ते सध्याचा कायदा बदलू शकते. पण सध्याचे कायद्यानुसार CBIला राज्यात काम करताना राज्याची परवानगी लागते. इतर राज्यसुद्धा असा निर्णय घेऊ शकतात," असं ते म्हणाले.
 
9. गौतम अवस्थी म्हणतात,"हा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा केंद्र-राज्य संबधाशी निगडित आहे. CBIमध्येच अंतर्गत वाद बाहेर आला आहे आणि लोकांचा त्यावरील विश्वास कमी झाला आहे. CBIचा वापर राजकीय हत्यार म्हणून झाला तर लोकांचा या संस्थेवरील विश्वास डळमळणारच."
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

U-23 World Wrestling Championship: भारताने रचला इतिहास, पहिल्यांदाच तीन पदके