Publish Date: Tue, 30 Aug 2022 (15:40 IST)
Updated Date: Tue, 30 Aug 2022 (15:42 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नाही. अडीच वर्षात महाराष्ट्र किमान दहावर्ष मागे गेला आहे. त्यामुळे हे सरकार गणरायाच्या कृपेने गेलं आणि गणरायाच्या कृपेने भाजप-शिंदे गटाचं सरकार आलं आहे. महाराष्ट्रासह भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे राज्य सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करेल असा मला विश्वास आहे, असं नारायण राणे म्हणाले.
दसरा मेळावा कुणाचा आणि आवाज कुणाचा?, यावरून रणकंदन सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नारायण राणे म्हणाले की, आवाज कुणाचा याला उत्तर मिळालेलं आहे. त्यांचं सरकार तर गेलंय म्हणजे आवाज गेला. शिवसेना कुठेय आणि त्यांच्याकडे किती आमदार आहेत. शिंदे गटात ४० पेक्षा जास्त आमदार गेले आहेत. उरलेले लवकरच जातील. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे यांचं काही अस्तित्व राहिलेलं नाहीये, असं नारायण राणे म्हणाले.