Publish Date: Fri, 15 Nov 2019 (11:20 IST)
Updated Date: Fri, 15 Nov 2019 (11:22 IST)
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आलाय. त्यामुळं हजारो रुग्णांना सरकारकडून मिळणारी मदत बंद झालीय.
राज्यातील गरीब-गरजू रुग्णांना वर्षानुवर्षं आर्थिक आधार देण्याचं काम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून केलं जातं. या सहाय्यता निधीसाठी अनेक व्यक्ती आर्थिक हातभार लावत असतात. त्यातून गरजू रुग्णांना मदत पोहोचवली जाते.
हे कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी आता राजकीय नेत्यांकडून सुरू झालीय.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे म्हणाले, "राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत दखल घेत रुग्णांना मदत देण्याबाबत निर्देश द्यावेत ही विनंती"
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्यासाठीचं पत्र राज्यपालांना पाठवलं आहे.