Publish Date: Wed, 28 Nov 2018 (08:07 IST)
Updated Date: Wed, 28 Nov 2018 (08:09 IST)
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून, दुसऱ्या आठवड्यातही आरक्षणावरुन विरोधक आक्रमक आहेत. मंगळवारी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. मात्र याच गोंधळात तब्बल ९ विधेयके बहुमताच्या जोरावर सरकारने संमत करून घेतली. आरक्षणावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. कामकाज पुन्हा सुरू होताच विधेयके पुकारण्यास सुरुवात झाली. तसेच ९ विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आली.
दरम्यान, विधेयकावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी परवानगी मागितली. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यावरून भुजबळ यांनी नाराजी वक्ता करत सभात्याग करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सरकारची बाजू मांडत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत त्यांना केवळ गोंधळ घालायचा असून, सरकारची भूमिका चर्चा करण्याचीच असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना विरोधक गोंधळ घालत होते. तेव्हा विरोधकांना का गप्प करण्यात आले नाही, असा अप्रत्यक्ष टोला बापट यांनी भुजबळ यांना लगावला.