Publish Date: Thu, 24 Mar 2022 (15:15 IST)
Updated Date: Thu, 24 Mar 2022 (15:16 IST)
बंगालच्या उपसागरात आसानी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. चक्रीवादळ पूर्वीच, कोकणात मोठ्या प्रमाणात गेले काही दिवस ढगाळ वातावरण पसरल्याने आंबा पिकांवर मोहर करपा व फळगळ सारखी समस्यां निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक फुकट जाण्याची भीती बागायतदार शेतकरी व्यक्त करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण ,खेड ,राजापूर, या परिसरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे सूर्याचं दर्शन होत नसल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आंब्यावरील मोहोर काळवंडला असून, फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आंब्याच् पीक यावर्षी फुकट जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
कोकणात वारंवार येणारे चक्रीवादळ व बदलते हवामान याचा हापूस आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र ,सरकारकडून दिलासा मिळत नाही, त्यामुळे कोकणी शेतकरी नेहमीच संकटात सापडला आहे.