Publish Date: Fri, 10 Mar 2023 (13:01 IST)
Updated Date: Fri, 10 Mar 2023 (13:08 IST)
नाशिकच्या सिन्नर येथील जवान गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात वाहून गेले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असून केंद्रीय राखुव सुरक्षा दलातील कार्य करत होते. शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली. यावेळी जवानासोबत पत्नी आणि दोन मुलेही होती. अपघात झाल्यानंतर पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र जवान गणेश गिते वाहून गेले आहेत.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात गोदावरी कालव्यात वाहून गेलेल्या जवानाचे नाव गणेश सुखदेव गिते असं आहे. ते पत्नी आणि मुलांसह शिर्डीला गेले होते. घरी परत येत असताना सिन्नर तालुक्यात चोंढी शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघाताची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांना समजताच ते घटनास्थळी रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष पथकात ते तैनात असतात. 24 फेब्रुवारी रोजी गणेश गिते हे सुट्टीवर आले होते आणि घराच्या काही मीटर अंतरावर आले असतानाच दुचाकीचा अपघात होऊन ते गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले. अपघात झाल्याची बाब लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत गणेश गिते यांच्या पत्नी आणि मुलांना बाहेर काढले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.