Publish Date: Mon, 14 Nov 2022 (14:30 IST)
Updated Date: Mon, 14 Nov 2022 (14:34 IST)
राजीनामा देऊ नका, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांना आवाहन केले. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी असा निर्णय घेवू नये असे अजितदादांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितले.
विनयभंग घडला नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे.सध्या गलिच्छ पध्दतीचे प्रकार घडत आहेत.राज्यात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अस म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.यावरून सध्या गदारोळ सुरु आहे. यावर अजित पवारांनी भाष्य केलं.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्री घटनाास्थळी होते त्यांनी विनयभंग घडला नाही हे सांगावं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यात लक्ष घालावं असेही ते म्हणाले. लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.पण एक लक्षात घेतलं पाहिजे चार दिवस सासुचे तर चार दिवस सुनेचे असतात, असा सूचक इशाराही यावेळी त्यांनी दिला.
Edited by : Ratnadeep Ranshoor