Publish Date: Wed, 23 Dec 2020 (08:45 IST)
Updated Date: Wed, 23 Dec 2020 (08:47 IST)
बंद पडणाऱ्या चिपी विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊ नका, अशी भूमिका आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. चिपी विमानतळाला बाळासाहेबाचं नाव देऊन बाळासाहेबांचा सन्मान कमी करू नका, अशी मागणी मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. त्यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भूमिका मांडली.
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून चिपी विमानतळाला त्यांचे नाव दिले जाऊ नये, असे मला वाटते. हे विमानतळ नेमकं कधी सुरू होणार, आणि सुरु झाल्यास किती दिवस चालेल याबाबत शंका आहे. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं किती योग्य आहे, असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला. त्यापेक्षा कोकणावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई-गोवा महामार्गाला द्या, अशी मागणी उपरकर यांनी केली.