Publish Date: Mon, 09 Mar 2020 (17:04 IST)
Updated Date: Mon, 09 Mar 2020 (17:08 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांनी काम पाहून मतदान केलं पाहिजे असं आवाहन करताना भावनांच्या आहारी जाऊन मतदान करणार नाही हे लोकांनीच दाखवून द्यायचं असतं असं मत व्यक्त केलं आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “लोकांना सत्तेत आहेत त्यांच्याकडून अपेक्षा नाही, पण आमच्याकडून अपेक्षा आहेत. गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोक कुठे जातात कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?,” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला.
राज ठाकरेंनी म्हटलं की, “अनेकदा मला लोकांचंही कळत नाही. काम पाहून मतदान करतात की नाहीत हा प्रश्नच आहे. काम पाहून मतदान होणार नसेल तर विषयच संपला. जितकी आंदोलनं मनसेने गेल्या १० वर्षात केली तितकी कोणीच केली नाहीत. आपण लोकांना निकालही दाखवून दिले. रेल्वे स्थानकांच्या बाहेरचे फुटपाथ मोकळे झाले. पण मतदान करायच्या वेळी सगळं कुठे जातं कळत नाही”. आपली खंत व्यक्त करताना अशावेळी अपेक्षा घेऊन करायचं काय ? अशी विचारणा त्यांनी केली.