Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

अनिल देशमुखांना ईडीचे समन्स, बुधवारी हजर राहण्याचे आदेश

ED summons Anil Deshmukh to appear on Wednesday
, मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (13:18 IST)
- मयांक भागवत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा समन्स बजावले आहेत. हे ईडीने अनिल देशमुखांना बजावलेले पाचवे समन्स आहेत. देशमुख यांना बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
याआधी, आपल्यावर सक्तीची कारवाई होऊ नये यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती, पण कोर्टाने देशमुखांची याचिका फेटाळली होती.
 
अनिल देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "पुढे काय करायचं याचा विचार केलेला नाही. अनिल देशमुख यांच्याशी अद्याप संपर्क झाला नाही. आता सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. शरणागती पत्कारल्याशिवाय पर्याय नाही."
 
मनी लाँडरिंग प्रकरणात अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या दोन स्वीय सहायकांना कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
4 जुलै रोजी अनिल देशमुखांनी ही विनंती याचिका दाखल केली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका रद्द केली आहे.
 
अनिल देशमुख यांच्या सहायकांना ईडीची कोठडी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना 6 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
या दोघांची कोठडी आणखी सात दिवसांनी वाढवून मिळावी. अशी मागणी सरकारी पक्षाने ईडीच्या कोर्टात केली होती.
 
माजी गृहमंत्री यांच्यावरील मनी लाँडरिंग प्रकरणाची सुनावणी अंमलबजावणी संचालनालयाच्या न्यायालयात सुरू आहे. त्या ठिकाणी सरकारी पक्षाने ही मागणी केली.
 
"माजी गृहमंत्री संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे मध्यस्थ आहेत. त्यांच्याकडे सापडलेले पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते," असं सरकारी पक्षाने म्हटलं आहे.
webdunia
काही संशयित आणि आरोपी यांनी आम्ही चौकशीसाठी बोलावत आहोत यांच्यासमोर चौकशी करायची आहे. सात दिवसांच्या कोठडीत आरोपांचा जबाब घेण्यात आलाय अशी माहिती सरकारी पक्षाने दिली. "हे आरोपी चौकशीला सहकार्य करत नाही. सचिन वाझे यांना ओळखत नाही असं आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी सचिन वाझे यांना ओळखत नाही म्हणतात, पण कुंदन शिंदे यांचे सचिन वाझे यांच्यात फोन कॉल व्हॉटसप कॉल झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहे," असं सरकारी पक्षाने ईडी कोर्टात सांगितलं.
 
संजीव पालांडे यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. "ही खोटी स्टोरी बनवण्यात आली आहे, राजकीय हेतूने प्रकरणात छोटे मासे अडकले आहेत," असं ते यावेळी म्हणाले.
 
कुंदन शिंदे यांचे वकील म्हणाले, "आमच्या पक्षकारांची समन्स करून चौकशी करू शकता. कोठडीची गरज नाही. ईडीने नवीन काहीच माहिती कोर्टात दिलेली नाही. जुनी माहिती दिली आहे. चौकशीत ठोस काय पुढे आलं याची माहिती दिली नाही."
 
"IPS अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात येत होत्या. ती यादी तपासायची आहे. या IPS पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करायची आहे, या बदल्यांमध्ये दोघांची महत्त्वाची भूमिका असायची," असं देखील सरकारी पक्षाने म्हटलं आहे.
 
अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नाहीत
मनी लाँडरिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी (29 जून) ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले होते पण अनिल देशमुख हे कोर्टात हजर झाले नाहीत.
 
ईडीने चौकशीसाठी अनिल देशमुख यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे.
 
ईडीने शुक्रवारी (26 जून) अनिल देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं. मात्र, चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी ईडीकडे केली होती.
 
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांचे दोन स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना 25 जून रोजी अटक केली होती.
webdunia
'माझ्याविरोधात हे कारस्थान रचण्यात आलं आहे'
अनिल देशमुख यांच्या सचिवांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर ईडीने कोर्टात अनिल देशमुख मनी लॅांडरिंगमध्ये सहभागी आहेत असा आरोप केला होता.
 
अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की "माझ्याविरोधात हे कारस्थान रचण्यात आलं आहे. मी एक कायदा पाळणारा नागरिक असून याआधी देखील मी चौकशीला पूर्ण सहकार्य केलं आहे. यापुढेही करत राहीन."
 
'ऑडिओ किंवा व्हीडिओच्या माध्यमातून सदैव हजर राहू शकतो'
 
अनिल देशमुख यांनी पत्रात लिहिलं आहे की,
 
"माझं वय 72 वर्षे आहे आणि उच्चरक्तदाब, हृदयाचा त्रास यांसारख्या आजारांशी सुद्धा लढतोय. 25 जून 2021 रोजीच मी तुमच्या समोरासमोर काही तास माझा जबाब नोंदवला. त्यामुळे आज (29 जून) कदाचित मी स्वत: येऊ शकत नाही. माझ्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवत आहे.
 
"तुम्हाला नेमकी कोणती कागदपत्रं आणि माहिती हवी आहे, हे कळल्यावर मी ती सर्व माहिती आणि कागदपत्रे तुम्हाला देईन. ECIR ची प्रत माझ्याकडे नसल्यानं मी आवश्यक कागदपत्र देण्यास असमर्थ ठरतोय.
 
"ऑडिओ किंवा व्हीडिओच्या माध्यमातून मी कधीही तुमच्यासाठी तुमच्या वेळेनुसार उपलब्ध असेन.
 
"25 जूनच्या समन्सचं पालन करूनही, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जातायेत की, मी हजर राहण्यासाठी वेळ मागून घेतोय.
 
"मी लोकप्रिय नेता आहे. माझं पूर्ण आयुष्य मी सार्वजनिक क्षेत्रात घालवलं आहे," असं देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.
 
अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे रोजी चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
"आम्हाला कागदपत्र मिळाली तर अनिल देशमुख चौकशीला हजर राहातील," असं अनिल देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी म्हटलं आहे. "अनिल देशमुख अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार नाहीत," असं देखील सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
 
ईडीचे आरोप काय आहेत?
हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांची बदली, पोस्टिंग आणि बार मालकांकडून पैसे घेतल्यासंदर्भात असल्याची माहिती ईडीने कोर्टात दिली होती.
 
ईडीने रिमांड अर्जात दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले. बार मालकांनी गुड लक मनी म्हणून सचिन वाझेंना 40 लाख रुपये दिले होते. हे पैसे नंबर '1' ला देण्यात येणार होते. पण हा नंबर '1' कोण याचा खुलासा ईडीने अद्यापही केलेला नाही.
 
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, बार मालकांकडून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये 4.70 कोटी रुपये घेण्यात आले. मुंबईतील बार सुरळीत पद्धतीने सुरू राहावा, यासाठी सचिन वाझेंना पैसे देण्यात आले होते.
 
अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले. त्यांनी हा पैसा दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून साई शिक्षण संस्थेकडे वळवला, असा ईडीने आरोप केलाय.
 
सचिन वाझेंनी जबाबात काय म्हटलंय?
ईडीने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांनी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला आहे.
 
सचिन वाझेंनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पैसे गोळा करून कुंदन शिंदे यांना दिले होते.
 
पैसे हवालाच्या माध्यमाने अनिल देशमुख यांच्या संस्थेत पोहोचले?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी मिळण्यासाठी कोर्टात दाखल रिमांड रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, हवालाच्या मदतीने बारमालकांकडून मिळालेला पैसे अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत डोनेशन म्हणून देण्यात आला.
 
ईडीच्या दाव्याप्रमाणे, श्री साई शिक्षण संस्थेच्या बॅंक स्टेटमेंटचा अभ्यास केला असता, गेल्या काही काळात 4 कोटी 18 लाख रुपये या संस्थेला दिल्लीच्या विविध कंपन्यांकडून मिळाल्याचं समोर आलं.
 
या कंपन्या फक्त पेपरवर आहेत आणि ट्रान्सफर एन्ट्री करण्याचे काम करतात, असं ईडीने कोर्टात सादर आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
या कंपनीतील एका संचालकाने ईडीला दिलेल्या जबाबात सांगितलं की, नागपूरच्या एका व्यक्तीने हे पैसे श्री साई शिक्षण संस्थेला दान करायचे आहेत. देशमुख कुटुंबियांच्या सांगण्यावरून पैसे रोखमध्ये मिळाले होते आणि विविध कंपण्यांच्या माध्यमातून या ट्रस्टमध्ये डोनेशन म्हणून देण्यात आलेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तालिबानः मराठ्यांना पानिपतमध्ये हरवणाऱ्या अब्दालीला अफगाणिस्तानात इतकं का मानतात?