Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंची बंडानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत...'

eknath shinde
, मंगळवार, 21 जून 2022 (15:20 IST)
'नॉट रिचेबल' एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे पहिल्यांदाच आपली भूमिका मांडलीय.
 
एकनाथ शिंदेंनी ट्वीट केलंय की, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."
 
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी हे शिवसेनेचे विधमंडळातील नवे गटनेते असतील.
 
अजय चौधरी शिवसेनेचे शिवडीहून आमदार आहेत. ते पहिल्यांदा 2014 मध्ये निवडून गेले आहेत. 2015 मध्ये ते नाशिकचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख झाले. 2019 मध्ये ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत.
 
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील 11 आमदारांसोबत त्यांनी सुरतच्या ल मेरेडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री संजय कुटे सूरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे भाजपनंही आता आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचं स्पष्ट होत आहे. निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
 
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सोमवार संध्याकाळपासून आहे. आमदार संपर्क कक्षेच्या बाहेर गेल्याचं कळताच वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबई आणि परिसरातील आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.
 
दरम्यान शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली आहे. मतदानानंतर सायंकाळी 6 वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांचा फोन बंद येत आहे. त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
 
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय? अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सकाळी राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची तातडीची बैठक झाली असताना दुसरीकडे राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडली