Publish Date: Fri, 05 Aug 2022 (07:30 IST)
Updated Date: Fri, 05 Aug 2022 (07:37 IST)
सांगली महाविकास आघाडीने वाढीव गट आणि गणाचा घेतलेला निर्णय बुधवारी शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केला आहे. यामुळे आता पूर्वीप्रमाणे म्हणजे २०१७ प्रमाणेच जिल्हा परिषदेसाठी ६० तर पंचायत समितीसाठी १२० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे. दरम्यान प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्याने केलेली तयारी वाया गेली आहे. या विरोधात काहीजण न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे.
आघाडी सरकारने नवा कायदा केल्यानंतर जिल्ह्यात आठ गट तर १६ गण वाढून जिल्ह्यात ६८ गट तर १३६ – गण झाले होते. मात्र आता शिंदे सरकारच्या नव्या निर्णयामुळे हे सर्व रद्द होऊन २०१७ प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.
रद्द झालेले मतदारसंघ मिरजेतली नांद्रे, हरिपूर, जतेतील करजगी, वाळेखिंडी, माडग्याळ, वाळव्यातील बहाद्दरवाडी, कुरळप, नेर्ले शिराळ्यात सागाव, तासगावमधील कवठेएकंद, पलूसमधील सावंतपूर, खानापूर करंजे आणि आटपाडीतील निंबवडे मतदारसंघ रद्द झाले आहेत.