Publish Date: Tue, 05 Dec 2017 (09:21 IST)
Updated Date: Tue, 05 Dec 2017 (09:23 IST)
राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला येत्या १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी २४ नोव्हेंबरपर्यत राज्यभरातून २ लाख ३३ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शासनाकडून घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा १२ ते २१ डिसेंबरदरम्यान आॅनलाइन होणार आहे. राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याचे नियोजन शासनाने केले असले तरी शिक्षक भरतीसाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत, याची शासनाने आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
या भरतीसाठी शासनाने अद्ययावत पद्धत वापरली आहे. शिक्षणसेवक व शिक्षक भरतीसाठी सरल पोर्टलद्वारे असलेल्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना मान्यताच मिळणार नाही. तसेच रिक्त जागांची माहिती मिळताच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जाणार आहे. बिंदूनामावलीसाठी 'पवित्र' हे पोर्टल सुरू केले आहे. पद भरतीची जाहिरात या पोर्टलवर द्यावी लागणार आहे. सदर जाहिरात १५ दिवस राहणार असून दोन वर्तमानपत्रातून प्रकाशित करावी लागणार आहे.