Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार-सोमय्यां

आणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार-सोमय्यां
, मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (15:41 IST)
येत्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार आहे. त्यात शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. मात्र, सोमय्या यांनी या चारही मंत्र्यांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
किरीट सोमय्या आज अमरावतीत आले आहेत. सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार नेते, मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. या चारही मंत्र्यांविरोधातील तक्रारी विविध तपास यंत्रणांना दिल्या आहेत. या चार मंत्र्यांमध्ये दोन शिवसेनेचे आहेत. एक मुख्यमंत्री मित्र परिवारातील महत्त्वाचा सदस्य आहे. दुसऱ्याचं वर्णन करत नाही. दोन्ही मुख्यमंत्री मित्र परिवारातील सदस्य आहेत. त्यापैकी एक कॅबिनेट मंत्री आहे. तसेच काँग्रेसच्या विदर्भातील कॅबिनेट मंत्र्याचाही यात नंबर आहे. त्याचीही फाईल आली आहे. एजन्सीकडे कागदपत्रे पाठवली आहे. चौथे एनसीपीचे मंत्री आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं. सोमय्यांना या मंत्र्यांची नावे सांगतली नाही. केवळ हिंट दिल्या आहेत. त्यामुळे हे मंत्री कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जनतेने मला जबाबदारी दिली आहे. गेल्या १२ महिन्यात या सरकारचे १०० घोटाळे बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातील २४ मोठ्या घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. अर्धा डझन मंत्री आणि अधिकारी सध्या जामिनावर आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आम्ही ४० घोटाळे ओपन केलेले असतील. आतापर्यंत २८ घोटाळे उघड करण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
 
घोटाळे काढतो म्हणून जिल्हाबंदी
मला अमरावतीत यायचं होतं. पण मला थांबवण्यात आलं. हे अजीबोगरीब सरकार आहे. यांचे मंत्री घोटाळे करतात. मी घोटाळे उघड केले तर जिल्हाबंदी होते. नगरमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. मला तिकडेही जाण्यास बंदी करण्यात आली होती, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
 
पोलिसांच्या आशीर्वादाने अमरावतीत दंगल !
सोमय्या यांनी राज्यातील आघाडी सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत. अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले होते. त्यावेळी पोलिसांना तत्काळ सूचना गेल्या. हे होऊ द्या, असं पोलिसांना सांगितलं गेलं, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी आज अमरावती हिंसाचारातील पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारावरून सोमय्या यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ले चढवले. १२ तारखेला हजारो लोकं रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही. पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या, असा दावा सोमय्या यांनी केला.
आघाडी सरकार १२ तारखेचा हिशोब का देत नाही? हे सरकार १२ तारखेचं त्याचं विस्मरण करत आहे. त्या दिवशी तीन ठिकाणी मिरवणुका निघाल्या. या मिरवणुका यांच्या आशीर्वादने निघाल्या होत्या का? याची चौकशी झाली पाहिजे. कुठे मशीद पेटवण्यात आली? त्रिपुरात का? कुणी अफवा फैलावली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या घटनेचा शोध का घेत नाही?, असे सवालही त्यांनी केला.
 
महिलांना सुरक्षा पुरवा
अमरावतीत मला अनेक महिलांनी निवेदने दिली. वेदना व्यक्त केल्या आहे. या महिलांना संरक्षण देण्याची मी सरकारला विनंती करणार आहे. या महिलांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं त्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापरिनिर्वाण दिन नियमावली जाहीर, चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास मनाई