राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.
नाशिक पदवीधर निवडणुकीच्यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वांच्या समोर आला होता. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणूक ही काँग्रेसकडून लढण्याऐवजी अपक्ष लढणे पसंत केले. ज्यानंतर त्यांच्या वडिलांना म्हणजेच सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते. ज्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे सर्वांना पाहायला मिळाले. त्यानंतर आज विधिमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि आमदार सत्यजित तांबे हे एकमेकांच्या समोर आले. त्यावेळी “काय सत्यजित आवाज देत नाहीस”, अशी विचारणा अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देत “काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला,” असे अशोक चव्हाणांना म्हटले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.