Publish Date: Mon, 12 Feb 2018 (09:00 IST)
Updated Date: Mon, 12 Feb 2018 (09:01 IST)
विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटीत तीन जणांचा जीव गेला आहे. यात जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडल्यामुळे नामदेव शिंदे(७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे शेतात जात असताना त्यांना गारांचा मार बसला. तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात आसाराम जगताप (६५) यांचाही गारांचा मार लागून मृत्यू झाला. शौचाला जात असताना गारांच्या तडाख्यात त्यांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील महागाव गावातील यमुनाबाई हूंबाड (८०) यांनाही गारांच्या तडाख्यात आपला जीव गमवावा लागला.
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला. जालना, वाशिम, बीड, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यात गारपिटीनं अक्षरक्षः थैमान घातलं. काही वेळ ही गारपीट झाली असली तरी अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराइतक्या गारा कोसळल्या. गहू आणि हरभरासारखी पिकं काढणीवर आलेली असताना झालेल्या या गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.