Publish Date: Wed, 25 Dec 2019 (12:19 IST)
Updated Date: Wed, 25 Dec 2019 (12:22 IST)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदींनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ठाकरे म्हणतात, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे 16 नोव्हेंबर 2013 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकषासह अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने हा विषय साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळवले आहे. खूपच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे.