Publish Date: Tue, 07 Feb 2023 (07:51 IST)
Updated Date: Tue, 07 Feb 2023 (07:54 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. विनोद तावडे यांनी अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे सांगत असताना या विधानाचा हवाला देत सदर वक्तव्य केले. यावर आता भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही, असा टोला लगावला.
काय म्हणाले विनोद तावडे
विनोद तावडे यांनी तीन ट्विट केले आहेत. याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांना टॅग केले आहे.
मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही.शाहिस्ते खान,औरंगजेब शिकवला म्हणजे महाराजांचे शौर्य कळते का?त्यांना असं म्हणायचं आहे का,कसाब आला म्हणून शहीद तुकारम ओंबळे,करकरे यांचे शौर्य दिसले.ते शूर होतेच,त्यासाठी कसाबने येण्याची गरज नव्हती.
मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ,आदीलशाही,कुतुबशाही,निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार.मोगलांनी कलेला आश्रय दिला,त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं,हा इतिहास काढणार.अकबर द ग्रेट ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली,याची शिकवण बाजूला काढणार.मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, सं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही,असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले
मला एक दिवस विनोद तावडे विधानसभेत म्हणाले, आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातून काढणार. मग शिवाजी महाराज गोट्या खेळताना दाखविणार का? समोर औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. त्यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवितात हे जगासमोर येते. १६६९ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा खजिन्याचे टाळे उघडा, हे सांगणारे शिवाजी महाराज जगातले पहिले राजे होते.”, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथील सभेत केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor
webdunia
Publish Date: Tue, 07 Feb 2023 (07:51 IST)
Updated Date: Tue, 07 Feb 2023 (07:54 IST)