Publish Date: Fri, 06 Sep 2019 (12:34 IST)
Updated Date: Fri, 06 Sep 2019 (12:36 IST)
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना यंदाच्या वेतन करारात भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या निर्णयामुळे राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या ३२.५० टक्के तर विविध भत्त्यांमध्ये १०० टक्के वाढ करण्यात येणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनेने निर्णयाचे स्वागत केले आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरूवारी तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनासोबत आणि विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीमध्ये बावनकुळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली.
राज्य सरकारप्रमाणे १२५ टक्के महागाई भत्ता मूळवेतनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक सहाय्यक प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून आता त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार तर तिसऱ्या वर्षी १७ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाशिवाय २० टक्के अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे. वर्ग ४ च्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ५०० रुपये वाढ करण्यात आलेली आहे.